लांजा : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात पुन्हा एकदा गतवर्षीची परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने लांजा नगर पंचायतीने पावसाळ्यापूर्वी गटार खोदाई करून शहरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी लांजा तालुका व्यापारी संघटनेचे माजी पदाधिकारी खलील मणेर यांनी केली आहे.
याबाबत बोलताना खलील मणेर म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असताना महामार्गाच्या दुतर्फा गटारें नसल्याने पावसाळ्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
गटारांअभावी शहरात दुकानांसमोर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. तर महामार्गावरुन वाहणारे पावसाचे पाणी गटारा नसल्याने थेट व्यापार्यांच्या दुकानात घुसते. गतवर्षीच्या पावसाळ्यात माझ्यासह शहरातील अनेक व्यापार्यांच्या दुकानांमध्ये अशा प्रकारे पावसाचे पाणी घुसले होते.
ही बाब लक्षात घेता गतवर्षीची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नगरपंचायतीने महामार्गाच्या दुतर्फा गटार खोदाई करावी. साधारणपणे दोन ते तीन फुटापर्यंत गटारे खोदावीत.जेणेकरून पावसाळ्यातील पडणारे पाणी या गटारातून वाहून जाण्यास मदत होईल. पावसाळा हा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे तत्पूर्वीच नगरपंचायतीने याबाबत कार्यवाही करावी आणि व्यापारी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेवटी खलील मणेर यांनी केली आहे.