जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसने बहुतांश देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाचा विषाणू आता भारतातील बहुतांश राज्यात पसरला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास वैद्यकीय आणीबाणी लागू झाल्याने सर्वकाही बंद दिसत आहे. राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना. आरोग्य मंत्री राजेश टोपे जवळपास चोवीस तास याच कामात व्यग्र आहेत. या व्यस्ततेतून काही क्षणाची उसंत काढून ते मुंबईतील रूग्णालयात जातात. रूग्णालयात अॅडमिट असलेल्या जीवन मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या आईला ते भेटतात. अवघ्या काही मिनिटांचीच ती भेट असते. गेल्या काही दिवसांपासून हाच टोपे यांचा दिनक्रम बनला आहे. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. राज्य सरकारच्या पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री टोपे चांगली भूमिका बजावत आहेत. मात्र, कामाचा ताण या दोघांच्याही चेहऱ्यावर जाणवत असला तरी अत्यंत जबाबदारीने हे काम सुरू असल्याचे दिसते. पाच वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या कळात टोपे यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी होती. त्या काळातही त्यांनी या विभागाचे काम नेटाने सांभाळले होते.