रत्नागिरी : सण व उत्सवातून धार्मिक एकता व बंधुत्वाची भावना वाढीस लागते. त्यामुळे ३ मे रोजी साजरे होणारे अक्षय तृतीय व रमजान ईद हे दोनही सण शांततेत व धार्मिक एकोप्याने साजरे करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्हावासीयांना केले आहे.
आज याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील शांतता कमिटी सदस्यांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग, एस एल पाटील पोलीस उप अधीक्षक (गृह), वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी व राजकीय संघटनांचे नेते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
३ मे रोजी अक्षय तृतीय व रमजान ईद हे दोन सण साजरे होत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे या सणांवर निर्बंध होते. मात्र आता हे निर्बंध हटल्याने समजात मोठा उत्साह आहे. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलीस दलाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व धर्मियांनी सामाजिक भान ठेवत हे सण शांततेत आणि गुण्यागोविंदाने साजरे करावेत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या शांतता समितीच्या बैठकीत केले आहे.
या बैठकीत उपस्थितांनी देखील पोलिसांच्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद दिला असून शांतप्रिय रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रथेनुसार यावर्षी देखील हे सण पार पडतील असे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 27-Apr-22