चिपळूण : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार दि. २८ एप्रिल रोजी चिपळुणात गाळ काढण्याच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाचे कोकण विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वा. पंचायत समितीच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक होणार आहे.
चिपळुणात जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरानंतर कोट्यवधीचे नुकसान झाले. पुराची तीव्रता कमी व्हावी आणि पूररेषा पातळी कमी व्हावी या हतूने जलसंपदा खात्यामार्फत चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिव नदीमधील गाळ काढला जात आहे. राज्य शासनाने या कामासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध केलाआहे.या शिवाय शिवनदीतीलगाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनच्यावतीने मशिनरी उपलब्ध करण्यात आली असून वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने मशिनरी दिली आहे. गेल्या महिनाभरात कोयना अवजल मोठ्या प्रमाणात वाशिष्ठीमध्ये सोडण्यात येत असल्याने काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.
वाशिष्ठीमधील केवळ पन्नास टक्केच गाळ काढण्यात आला असून पावसाळ्याच्या अगोदर निश्चित केलेले उद्दीष्ट गाठणे शक्य होईल की नाही या बाबत साशंकता आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर पुराची पातळी किती कमी होईल या बाबत अजूनही कोणताही अंदाज व्यक्त करता येत नाही. त्यामुळे गाळ काढण्याबरोबरच कोयनेच्या अवजलाचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. या शिवाय काढलेला गाळ वाशिष्ठी व शिव नदीबाहेर कसा काढला जाईल, तो किनाऱ्यावर न ठेवता अन्यत्र कसा हलविला जाईल याचे नियोजन आढावा बैठकीत होणे गरजेचे आहे.
या बैठकीला जलसंपदा विभागाचे स्थानिक अधिकारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, डीवायएसपी सचिन बारी, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, नाम फाऊंडेशन व चिपळूण बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 27-Apr-22