मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारविरोधात एक याचिका दाखल केली आहे. माझ्यावरील शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्यांनी याचिकेमार्फत केली आहे. माझ्यावर हल्ल्ला केलेल्या शिवसेनेच्या गुंडांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची तक्रारही याचिकेच्या माध्यमातून सोमय्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंतत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे खोटे एफआयआर दाखल करतात. खार पोलीस स्टेशनच्याबाहेर शिवसेनेच्या ७० ते ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. या खोट्या एफआयआरच्याविरोधात मी आज मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. न्यायालयाला मी सोमवारी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस ठाण्यासमोर दगडफेक करण्यात आली. यावेळी काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा दावा करत सोमय्या यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आणि केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
हल्ल्याबाबत महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. किरीट सोमय्या यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचं समोर येत आहे. ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असं वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आल्याची माहिती आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:42 PM 28-Apr-22