मुंबई : राज्यात भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र सरकार भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढला. महाराष्ट्रातही सरकारने असाच तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, भाजपचे नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात अशांतता निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे, असे राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांना १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या सभेविषयी विचारणा करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची किती मोठी सभा झाली, पाहिली नाहीत का? १ मे रोजी महाराष्ट्रात सहा सभा आहेत. महाराष्ट्राला सभांचं वावडं नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पाठवण्यात आलेल्या समन्सविषयीही भाष्य केले. एकाच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ईडीकडून लक्ष्य केले जात आहे. मात्र, हे सर्वकाही आम्ही बघून घेऊ, असे राऊत यांनी म्हटले. किरीट सोमय्या हे ‘दिलासा घोटाळ्या’चे लाभार्थी आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, ते स्वत: गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे राऊत यांनी सांगितले.
भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न होत आहे. राज ठाकरे यांनी योगी कोण आणि भोगी कोण, हे सांगितले आहे. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करता येईल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 29-Apr-22