गुहागर : तालुक्यातील काळसूर कौंढर येथील मुख्य पुलाचे काम मंजूर होऊन सुमारे सहा महिने उलटले. ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. मात्र, सुमारे तीन महिने हे काम बंद आहे. याबाबत ग्रा.पं.ने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरला पत्र दिले आहे. पुलाचे काम त्वरित सुरू न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेले अनेक वर्षे काळसूर कौढर, झोंबडीमधून जाणाऱ्या गुरववाडी येथील पुलाचे काम शासनाकडे वारंवार मागणीकरूनही होत नव्हते. याठिकाणी असलेल्या नदीला बाराही महिने पाणी असते. पावसाळ्यामध्ये ही नदी दुतर्फा वाहत असते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती.
त्यानुसार या कामाला मंजुरीही मिळाली. निधी उपलब्ध झाला. मात्र, हे काम गेले सुमारे तीन महिने बंद आहे. हे काम बंद असल्याने येथील जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायतकडे विचारणा केली. त्यानुसार ग्रा.पं.ने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरला पत्र दिले आहे.
यावर, या रस्त्याची सर्व पुलांची कामे एकाच ठेकेदाराकडे आहेत. मात्र, त्वरित येथील काम सुरु करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून देऊ. या संदर्भात ठेकेदाराला सूचना देऊन हे काम लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन उपअभियंता निकम यांनी दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 29-Apr-22