रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासाठी ६ कोटी १२ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच त्यांच्या कोकण दौऱ्यात मच्छीमारांच्या अडचणींविषयी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम तात्काळ दिली जाईल, असा विश्वास दिला होता. त्यानुसार मच्छीमारांचे डिझेल परताव्याचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. त्याच भाग म्हणून दोन्ही जिल्ह्यांसाठी मिळून ११ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला ६ कोटी १२ लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४ कोटी ९२ लाख रुपये मिळतील.