कोरोना व्हायरचा फैलाव वाढत आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. काळाबाजार वाढत आहे. यावर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे. मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजार होत असल्याची बाब निदर्शान आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. तसेच या वस्तूंच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. या किमती जून महिन्यापर्यंत कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे दर सरकारने आखून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन तसेच तीन स्तरांच्या मास्कचे दर आठ ते दहा रुपये तर २०० मिलिलीटर सॅनिटायझरची बाटली १०० रुपयांना असल्याचं त्यांनी सांगितले. ३० जूनपर्यंत हेच दर कायम राहतील, अशी माहिती पासवान यांनी दिली आहे.
