शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी समूह शेतीला प्रोत्साहन द्यावे : पालकमंत्री ॲड. अनिल परब

0

रत्नागिरी : कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या 85 टक्के आहे. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी समूह शेतीला प्रोत्साहन द्यावे, तसेच खरिपासोबत रबी हंगामातही अधिक क्षेत्र पेरणीखाली येईल, असे नियोजन करा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिल्या.

2022-23 च्या खरीप हंगाम नियोजनाचा आढावा त्यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

एक एकर किंवा त्याहून कमी शेती असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ देणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर समूह शेती महत्वाची ठरेल, असे ते म्हणाले. बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र 3 लाख 98 हजार 404 हेक्टर आहे. यातील 91 हजार 992 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. होणाऱ्या लागवडीपैकी 80 टक्के क्षेत्रावर भातपिकाची तर 15 टक्के क्षेत्रावर नागली पिकाची लागवड प्रस्तावित आहे. इतर क्षेत्रात भाजीपाला व कडधान्य पिकविला जातो. सध्या करण्यात आलेल्या नियोजनात 82 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर बियाण्यांचा व खतांचा पुरवठा होईल तसेच यात कोणतीही साठेबाजी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे ॲड. अनिल परब म्हणाले. हापूस, काजू आणि नारळ या पिकांचे जिल्ह्यात एकूण असणारे क्षेत्र गेल्या वर्षभरात 1966 हेक्टरने वाढले असून आता फळपिकाखाली जिल्ह्यात एकूण 1 लाख 75 हजार 305 हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे. यात आंब्याचे क्षेत्र 66,433 तर काजूचे 1,02,400 हेक्टर क्षेत्र आहे. 5212 हेक्टर क्षेत्रावर नारळाचे पिक आहे. जिल्ह्यात प्रती हेक्टरी 3,294 किलो भात पिकाचे सरासरी उत्पादन आहे. याबाबतीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल आहे. यंदा खरीप हंगामासाठी 6141 क्विंटल बियाणे व 14,640 मेट्रीक टन खताची गरज लागेल हे लक्षात घेत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्यासह 10 ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सध्या नोंदणीकृत 346 विक्रेत्यांपैकी 190 विक्रेते पॉसचा वापर करीत आहे. जिल्ह्यात एकूण 801 शेतकरी गट असून त्यांना बांधावर खत वाटप अंतर्गत 121 टन खत वाटपाचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात 4616 हेक्टरवर लागवड होते. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे त्याचा वापर करुन रबी हंगामात लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी नियोजन करण्याची सूचना खासदार विनायक राऊत यांनी केली होती. या सूचनेचे पालन कृषि विभागाने करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

वीज जोडणीचे 421 अर्ज प्रलंबित
कृषिपंपाना वीज जोडणी अंतर्गत मागील वर्षी 418 अर्ज प्रलंबित होते. गेल्या वर्षभराच्या काळात 803 शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असली तरी प्रलंबित अर्जांची संख्या 421 झाली आहे. याबाबत वीज वितरण कंपनीने पूर्तता होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सौरपंपाची संख्या वाढवण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावेत, असे खासदार राऊत यावेळी म्हणाले. जिल्ह्यात 847 ग्रामपंचायती अंतर्गत 776 कृषी समित्या स्थापन झाल्या आहेत. या माध्यमातून 685 शेतीशाळा घेवून संकरित वाणाचा वापर तसेच योग्य वेळेस रोपे तयार करुन योग्य वेळी लावणी यासोबत खतांचा योग्य वापर आदींबाबत प्रशिक्षण देत भाताची उत्पादकता वाढविण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.फळबाग लागवड हा सातत्यपूर्ण कार्यक्रम असून मनरेगात देखील याचा समावेश करण्यात आला आहे. यंदा 4820 हेक्टर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 09-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here