अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही : शरद पवार

0

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत.

यावर शिवसेना आणि मनसेमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका वाक्यात उत्तर देत राज ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. “अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही”, असं शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जातंय हे मला माहित नाही. पण देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हेच खरे भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत. देशाची सुत्रं आज ज्यांच्या हातात आहेत ते लोक आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा नातू रोहित पवार देखील अयोध्या दौऱ्यावर आहे हे मलाही माहित नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.

१५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश नाहीत
सुप्रीम कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घेण्यात आदेश दिलेले नाहीत हे स्पष्ट करताना शरद पवार यांनी कोर्टाचा नेमका निकाल यावेळी सांगितला. “१५ दिवसांत निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलेलं नाही. निवडणूक प्रक्रियेसाठीच्या तयारीला १५ दिवसांत सुरुवात करा असं कोर्टानं सांगितलं आहे”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. निवडणुकांबाबत आमच्या पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. “निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 10-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here