चिपळूण : चिपळूण तालुका रिक्षा चालकमालक संघाच्यावतीने येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले. सीएनजी गॅस तुटवड्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले असून रिक्षा चालकांना सीएनजी टंचाईमुळे चार तास रांगेत राहावे लागत आहे. याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, दिलीप चव्हाण, रिक्षा चालक-मालक संघटनांचे पदाधिकारी, रिक्षा मालक व व्यावसायिक उपस्थित होते.
या निवेदनानुसार, प्रदूषण मुक्तीसाठी सीएनजी गॅसवर चालणारी वाहने वाढत आहेत. मात्र, त्या प्रमाणात वाहनचालकांना गॅसचा पुरवठा होत नाही. शहरातील सीएनजी गॅस पंपावर अनेकवेळा रांगा लागतात. मागणीप्रमाणे गॅसचा पुरवठा होत नाही. गॅस भरण्यासाठी दिवसातून चार तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे रिक्षा व्यवसाय चालवायचा कसा? असा सवाल व्यावसायिकांनी केला आहे. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणे जिकरीचे होत आहे. व्यवसायावर याचा विपरित परिणाम होत आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे रिक्षा व्यावसायिकांना फटका बसला. आता सीएनजी टंचाईमुळे मोठा फटका बसत आहे. चिपळूण शहरात सीएनजीचे दोन पंप आहेत. त्यातील एक पंप पंधरा दिवस बंद आहे. याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 14-May-22