राजापूर : उन्हाळी सुट्टीत आपल्या मावशीच्या गावी आलेल्या युवकाचा कोदवली येथील वहाळातील कोंडीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. शुभम सिताराम भितळे (वय १७, रा. वाकेड खालची भितळेवाडी, ता. लांजा) असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम याच्या दुर्दैवी मृत्युमुळे कोदवलीसह वाकेड गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा आपल्या वाकेड भितळेवाडी येथून काही दिवसापूर्वी सुट्टीत कोदवली गावातील आपल्या मावशीकडे आला होता. मंगळवारी सकाळी तो आपल्या मित्रांसोबत कोदवली येथील वहाळावरील ओवळीची कोंड येथे आंघोळीसाठी गेला होता. आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. व त्याचा मृत्यू झाला.
याबाबत तरूणांनी तत्काळ गावात माहिती दिली. वाकेड येथील त्याच्या नातेवाईकांनाही कळविण्यात आले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शुभम याला तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी शुभम याचे चुलते यांनी राजापूर पोलिसांत खबर दिली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल प्रमोद वाघाटे करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 25-May-22