कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्यांनी सांगितले की, रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. तसेच गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. तसेच राज्याचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज संस्थांचे, तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून अजित पवारांनी त्यांचे अभिनंदन केले.
