जगभरासह भारतात कोरोनाचे संकट ठाकले असताना देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) वतीने आपल्या लाखो ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. विमा ग्राहकांना प्रीमियम भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे एलआयसीच्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रसह अनेक राज्यात ‘लॉक डाउन’ करण्यात आले आहे. त्यामुळे विमा हफ्ता भरायचा कसा, असा प्रश्न अनेक विमा ग्राहकांना पडला होता. लॉक डाउनमुळे ग्राहकांची विमा हफ्ता भरण्यासाठी होणारी गैरसोय आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेत एलआयसीच्या वतीने ग्राहकांना १५ एप्रिल २०२०पर्यंत विमा हफ्ता भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे विमा हफ्ता भरण्यास असमर्थ असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.