कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्याकरिता पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. काही नागरिकांकडून राज्यात संचारबंदी लागू असतानाही बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. अकारण गाड्या घेऊन नागरिक रस्त्यावर उतरत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्याच्या प्रत्येक घरातील माणूस या संसर्गापासून मुक्त राहावा यासाठी जनतेनेही संयम पाळून सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.