रत्नागिरी : लघुउद्योजकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने निघालेली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीची उद्यमिता यात्रा गुरुवारी (दि. १६ जून) रत्नागिरीत येणार आहे.
राज्यातील लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणार्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने हाती घेतले आहे. शासनाच्या या कार्यात राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने युथ एड फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. मुंबईतून गेल्या १० मे रोजी सुरू झालेली ही यात्रा १६ जूनला रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेच्या नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेने स्वीकारली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या यात्रेचे स्वागत होणार आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शासनाची ही उद्यमिता यात्रा राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. १७ ते १९ जूनदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १०० वन व्यावसायिकांसाठी चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये अनिवासी स्वरूपाच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 15-Jun-22