ब्रेकिंग: ठाकरे सरकारचं मोठं पाऊल, बंडखोर मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या फाईल्स मागवल्या

0

मुंबई : राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांविरुद्ध शह-काटशहाचे राजकारण केले जात आहे. एकीकडे राज्यपालांनी ठाकरे सरकारने गेल्या काही दिवसांत घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांची माहिती मागवली असतानाच आता ठाकरे सरकारनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री कायार्लयाने सुरू केली आहे. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांवर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागल्याची चर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे सरकारने बंडखोरांना आणखी एक धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी गेल्या महिनाभरात मंजूर केलेल्या सर्व फायली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. महिन्याभरातील सर्व फायली जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने शिंदे यांच्या कार्यालयाला दिला. एकनाथ शिंदे यांनी १ जूनपासून मंजूर करून घेतलेल्या नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सार्वजनिक उपक्रम) सर्व फाईल्स तातडीने जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता या मंत्र्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची तपासणी होईल, असे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदेंसह ९ बंडखोर मंत्र्यांची खातीच काढून घेतली

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी), फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:04 AM 28-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here