रत्नागिरी : आवाज कुणाचा, शिवसेनेचा… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो…. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला… राजन साळवी आगे बढो हम तुम्हारे साथ है…अशा गगनभेदी घोषणा देत राजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचे जवाहर चौक राजापूर येथे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजापूर शहरातील मातोश्री सभागृह येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केलेली असताना राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना संघटनेसोबत कायम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजापूर तालुक्यातील सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार स्वागत करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना संघटनेप्रती निष्ठेचा सार्यांसमोर आदर्श घालून दिल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशाचा गजरामध्ये स्वागत करताना ‘शिवसेना झिंदाबाद’ , ‘राजन साळवी आगे बढो’ अशा जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिली आहे. त्यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याने अनेकांना मी त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाईन असा संशय होता. मात्र, आपण कधीच नॉटरिचेबल नव्हतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण कट्टर शिवसैनिक असून शिवसेना संघटनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम अन् विश्वासामुळे आपण संघटनेशी ठाम राहीलो आणि आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपण कट्टर शिवसैनिक असून त्याचा आपणाला अभिमान आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांचे मिळणारे प्रेम हे आपले सौभाग्य आहे. मंत्रीपदाच्या लाल दिव्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्वास हीच आपली खरी संपत्ती आहे. कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील असा विश्वास आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिला आहे. ” अशी भूमिका आमदार राजन साळवी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.
शिवसेनेसह राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये राजकीय घडामोडी घडत असताना येथील आमदार श्री. साळवी यांनी सेनेच्या अन्य आमदारांसह नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांच्यासोबत जाण्याऐवजी श्री. ठाकरे यांच्यासमवेत राहीले आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असलेले आमदार श्री. साळवी राजापूर मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये झालेल्या सभेमध्ये तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकार्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी यांच्यासह पदाधिकार्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
माजी जिल्हाप्रमुख श्री. महाडीक यांनी बोलताना सर्वसामान्य शिवसैनिक, जिल्हाप्रमुख ते आमदार असा प्रवास करणारे श्री.साळवी यांनी वेळोवेळी कृतीद्वारे संघटनेप्रती दाखवून दिलेली निष्ठा निश्चितच कौतुकास्पद आहे. कितीही घडामोडी घडल्या तरी, जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी श्री राजेंद्र महाडिक, श्री. जगदीश राजापकर, श्री.पांडुरंग उपळकर, श्री.जया माने, श्री. प्रकाश कुवळेकर, तात्या सरवणकर, शरद लिंगायत, दुर्वा तावडे, संतोष हातनकर, संजय पवार आदींनी मनोगते व्यक्त करताना आमदार श्री. साळवी यांच्या भूमिका आणि निर्णयाचे कौतुक केले.
आमदार श्री. साळवी यांनी आपल्या कृतीतून राजापूर मतदारसंघासह येथील शिवसेनेची मान ताठ ठेवल्याच्या शब्दामध्ये कौतुक केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकांमध्ये घवघवीत यश मिळवून शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवित पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने आमदार श्री. साळवी यांचा पुष्पहार घालून स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
9:50 PM 28-Jun-22