रत्नागिरी : ‘कोरोना’ने सारे जनजीवन विस्कळीत झालेले असताना कोकणातील हापूस आंबा बागायतदारही हवालदिल झालेला आहे. आंबा बागायतदार, व्यवसायिकांना मुंबईत हापूस पाठविण्यासाठी वाहतूकीला परवानगी मिळाल्याने ‘कोरोना’च्या संकटात मोठा दिलासा मिळाला. मात्र अजूनही येथील आंबा बागायतदारांच्या मनात बाजारपेठा खुली होण्यासमोरील चिंता कायम आहे. आंबा वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर बैठक झाली. त्यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही वाहतूक होणार असल्याचे सांगण्यात आले. वाशी येथील बाजार समितीकडूनही प्रतिदिन 200 ट्रक आंबा कोकणातून विकत घेण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र बागायतदारांमध्ये आता वेगळीच चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. अजून बाजारपेठांची दारे खुली झालेली नाहीत. बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तू, भाजी वगळता अन्य व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हापूसची तोडणी करण्यापूर्वी बागायतदारांनी आपापल्या दलालांशी बोलून घ्या, मगच पुढील निर्णय घ्या, अशीही चर्चा बागायतदारांमध्ये केली जात आहे.