चिपळूण : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदावरून ज्यांनी पायउतार व्हायला लावले ते शिवसैनिक कसले? त्या बंडखोरांना मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. त्या बंडखोरांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नका. शुन्यातून पुन्हा शिवसेना निर्माण करू. आज चिपळूण गुहागरमध्ये कसल्याही प्रकारच्या बंडाची झळ पोहोचली नसली तरी सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. ते चिपळूण येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात आयोजित चिपळूण तालुका आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना अनंत गीते म्हणाले की, शिवसेनेला संकटाची सवय आहे. यापूर्वी छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, पण ही बंड वेगळी होती. त्यांना अन्य पक्षांनी सामावून घेतले. पण आताचे बंड वेगळे आहे. आताच्या बंडाला भाजपची साथ आहे. पक्षातून बंडखोर गेले आणि संकट टळले असे नाही. बंडखोर पक्षप्रमुखांना आव्हान देत आहेत त्यावरुन हे संकट टळले नाही. त्याची तीव्रता मोठी आहे. जसे आपण सर्वांनी कोरोना होऊ नये म्हणून लस घेतली, त्याप्रमाणे बंडाची झळ सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचू नये यासाठी आजचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे अनंत गीते यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी उपनेतेपदी निवड झाल्याबददल आमदार राजन साळवी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात आपली कारकिर्द मांडली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, आमदार सदानंद चव्हाण, जि.प. चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जि. प. चे माजी उपाध्यक्ष उदय बने, महेश नाटेकर, सुधीर शिंदे, बळीराम शिंदे, महिला आघाडी संघटक अरुणा आंब्रे, तालुकाप्रमुख सचिन बाईत, संदीप सावंत, राकेश शिंदे, अशोक नलावडे, राजू देवळेकर, दिलीप चव्हाण, उमेश खताते, निहार कोवळे, शशिकांत मोदी, विनोद झगडे, नेत्रा ठाकूर, ऐश्वर्या घोसाळकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. हा निर्धार मेळावा यशस्वी व्हावा म्हणून क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह शिवसैनिक आणि युवासैनिकांनी मेहनत घेतली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 12-Jul-22