मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न अनेकांच्या मनात रुंजी घालतोय की, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचलेत.
आता मोदी-शाहांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीनरचे आयोजन केला होता. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. हा दौरा आटोपून दोघेही मुंबईत परतलेत. त्यामुळे मंत्रिमंडळ आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
दिल्ली दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराबाबत विचारलं असता, ‘अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु. सुप्रीम कोर्टचा याच्याशी काही संबंध नाही. उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही’, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जेवण होतं. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनच्यापूर्वी होईल, असं शिंदे यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी थांबला आहात का? असा प्रश्न विचारला असता, असं काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाच्या यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 23-Jul-22