आंबडवे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन

0

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक डॉ. अंशुमन मगर आणि वकील दयानंद कांबळे उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या दशकपूर्तीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले व्याख्यान वकील दयानंद कांबळे यांचे आहे, असे सहायक प्राध्यापक अरुण ढंग यांनी सांगितले. कांबळे म्हणाले, लोककल्याणकारी राज्याची निर्मिती हे शासनाचे कर्तव्य आहे. कलम ३८ अन्वये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

सामाजिक-आर्थिक-राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी-प्रेम राहील व समतेची भावना निर्माण होईल आणि आदर्श समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्याने प्रयत्नशील राहावे. कलम ३९ अन्वये स्त्री-पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा, समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीची मालकी व नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल असे असावे. संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग होणार नाही, असे पाहावे.

नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय व ताकद यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये. बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली जावी. शोषणापासून तसेच नैतिक व भौतिक उपेक्षेपासून संरक्षण करावे.
डॉ. अंशुमन मगर म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशाची प्रगती आणि देशासमोर उभी असलेली आव्हाने यांचा विचार केला, तर आजही लोकमान्य टिळकांच्या चतु:सूत्रीची आठवण होते. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली होती. स्वदेशीचे महत्त्व या महत्त्वपूर्ण विषयावर आज विचार होणे आवश्यक आहे. आज देशाची आर्थिक परिस्थिती पाहता रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. देशाची आयात कमी करून निर्यातीवर भर देण्याची गरज आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here