”उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नव्हे, तर ती पवारांची माणसं”

0

सांगली : ‘म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा’, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा बोचऱ्या शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडूनच उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे, असा आरोपही आमदार पडळकरांनी केला आहे. ते आटपाडीमध्ये बोलत होते.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेली ‘निष्ठा यात्रा’ आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

‘म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा’, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली आहे. तसेच पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोप करत याआधी आपल्यावरही हल्ले झाले. ते राष्ट्रवादीकडून झाले होते, असा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला.

ज्या पद्धतीने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झालाय ते पाहता हा हल्ला शिवसैनिकांनी केलेला नाही. कारण शिवसैनिक इतक्या मोठ्या संख्येने पुण्यात नाहीत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोकं आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं आदित्य ठाकरेंची रॅले होतेय आणि जिथं जिथं मोठ्या सभा होताहेत तिथं खासकरून पवारांची माणसं तिथे उपस्थित असतात. त्यामुळे याच लोकांनी हल्ला केला असेल, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

उदय सामंत यांच्या कारवर हल्ला, सर्व आरोपींना पोलीस कोठडी

माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज सकाळी सहा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती. या सगळ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करत दुपारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. या सहा आरोपींना न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र त्याला नकार देत केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावण्यात आली आहे. हा फक्त खोटा गुन्हा आहे. कारण जे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत, त्यात पोलिसांनी अटक केलेला कुठलाही आरोपी दिसत नाहीए. त्यामुळे सर्वांना कमीत कमी पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद कोर्टात आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:27 PM 03-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here