रत्नागिरी : येथील नगर पालिका शाळा आणि आठवीपर्यंतच्या खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार वेळेत मिळावा आणि या आहाराची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी पालिकेने एक पथक नेमले आहे.
उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली कर प्रशासकीय अधिकारी आय. व्ही. चाळके आणि मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील या तीन अधिकार्यांचे हे पथक आहे. रत्नागिरी शहरातील सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी स्थानिक तीन युनिट नेमण्यात आले आहेत. या युनिटमध्ये एक बचत गटही आहे. गेल्या सोमवारपासून पोषण आहार वाटप सुरू झाले आहे. पोषण आहार वाटपाची सुरुवात असल्याने ते काही शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर लगेचच पथक ठेकेदारांच्या स्वयंपाकगृहांना भेटी देतात. या पथकाने नुकतीच क्रांतीनगर अंगणवाडी येथे असणार्या स्वयंपाकघराला भेट दिली. तेथील भात आणि वरणाची चवही घेतली. एसटी स्टँड येथील गोदूताई जांभेकर महिला विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट घेऊन पोषण आहाराबाबत विचारणा केली.