“ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, इतरांचं काय?”, ‘सामना’तून राष्ट्रवादीसह मित्र पक्षांना सवाल

0

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून ईडीची कारवाई आणि त्याविरोधात होणाऱ्या आंदोलनांवर भाष्य करण्यात आलंय. ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरते मग इतर पक्ष का आंदोलनं करत नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांना विचारण्यात आलाय. “लोकशाहीत निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळे झेंडे, काळा इतिहास ही प्रतिके आहेत. दक्षिणेतील देवांना तर काळ्या कपडय़ांचाच सोस आहे.

भाजपनेही अनेक आंदोलनांत काळे कपडे, काळे झेंडे यांचा मुक्त वापर केला आहे. महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण आहे, पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा!”, असं सामनात म्हणण्यात आलंय.

सामनातून मित्रपक्षांना सवाल
महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणारा एकमेव पक्ष म्हणून कॉंग्रेसकडेच बोट दाखवावे लागेल. महागाईबरोबरच काँग्रसने ‘ईडी’च्या विरोधातही जोरदार एल्गार केला. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. संसदेत व संसदेबाहेर י’ त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. प्रियंका गांधी यांना तर पोलीस फरफटत ओढत घेऊन जात आहेत, हे चित्र देशाने पाहिले. महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. महागाई, बेरोजगारी हे विषय गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते.

धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे. महागाईविरुद्ध आंदोलनाची खिल्ली उडवताना भाजपतर्फे हीच अफूची गोळी पुन्हा चारली आहे. महागाई विरोधात काळे कपडे घालून कॉंग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2019 रोजीच अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून कोट्यवधी हिंदूंचे शेकडो वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यामुळे त्या घटनेस आमचा विरोध आहे, हे दाखविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांनी काळे कपडे घालून आजच्या दिवशी आंदोलन केले,” असे श्री. अमित शहा यांनी सांगितले. प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे?

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 08-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here