दापोली : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाने शनिवारी पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातर्फे माहिती सत्र आयोजित केले होते. यावेळी देशी गाईंच्या उपयुक्ततेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विभाग भेट कार्यक्रमांतर्गत हे माहितीसत्र झाले. महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागात झालेल्या या माहितीसत्रात गाईच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, भारतातील गाईंचे वर्गीकरण,त्यांच्या उपयोगिता तसेच भारतीय अर्थशास्त्रातील पशुसंवर्धनाचे योगदान, व्यवस्थापन अशा विविध विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विभागाचे सागर खाटके आणि कु. दिव्या कोकणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन त्यांनी केले.
भारतात श्वेतक्रांतीनंतर गाईंची संख्या झपाट्याने वाढली हे खरे आहे, पण ही संख्या संकरित विदेशी गाईंची होती. आपल्या मूळ भारतीय गाई मात्र खूप कमी होत गेल्या. आजही त्या कमी होत आहेत. संकरित गाय खूप दूध देते. त्यामुळे पशुपालकाला भरपूर पैसे मिळतात. मात्र देशी गाईमध्ये असलेली प्रतिकारशक्ती, समज, काटकपणा विदेशी गाईंमध्ये नाही. याचा आपण विचार केला पाहिजे. देशी गाईचे दूध म्हणजे एक प्रकारे अमृतच असते, असा विचार यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.