रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरी विशेष कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी या कारागृहात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडीला भेट देत सावरकरांना अभिवादन केले. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भाजपची जी भूमिका आहे तीच माझी असेल, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणत्या अवस्थेत रत्नागिरीतील या कोठडीत काळ काढावा लागला असेल, याची कल्पना या कोठडीचा आकार पाहिल्यावर येते. हे पाहिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशप्रेमाबद्दल, देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना येते. त्यामुळे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे मी नतमस्तक झालो आहे.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा मोहीम सुरू केली आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या प्राणांचा आणि घरादाराचा त्याग केला, त्यांचे स्मरण करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. त्यामुळेच रत्नागिरीत मी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाला भेट देत आहे. देशाची प्रगती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे त्यांच्याच मार्गदर्शनात मी मंत्रिमंडळात काम करत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 13/Aug/2022