रत्नागिरी : येथील र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या समूहगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सूरश्री संघ विजेता ठरला.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सांस्कृतिक विभागातर्फे देशभक्तिपर समूहगीत गायन स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले आणि पर्यवेक्षिका प्रा. ए. एम. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले.
या स्पर्धेतील गीतांना राजन किल्लेकर आणि वादक-संचाने संगीतसाथ दिली. स्पर्धेत १७ संघांमधून १४५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी अनुक्रमे सूरश्री संघ (कला), स्वर निनाद संघ (वाणिज्य) आणि स्वरसाद संघ (विज्ञान) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळाले. या तिन्ही संघांना स्वातंत्र्यदिनी महाविद्यालयात आयोजित केल्या जाणार्या मुख्य समारोहात मान्यवर आणि अतिथींसमोर पुन्हा सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
या नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्पर्धेसाठी प्रसाद भाटवडेकर यांनी परीक्षण केले, तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सागर पोकळे यांनी केले. कु. हर्षाली केळकर या विद्यार्थिनीने समयोचित सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुनील गोसावी तसेच सांस्कृतिक विभागातील अन्य शिक्षक सदस्य उपस्थित होते.