मुंबई : युती सरकारचे मंत्री उदय सामंत हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. रविवारी सकाळी शिवसंग्रामचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच मंत्री उदय सामंत यांनी आपले रायगड येथील नियोजित सत्काराचे कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त केल्या आहेत. मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
माणगाव येथे आदरांजली सभा घेत मंत्री सामंत यांनी विनायक मेटे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री.सामंत म्हणाले, माझ्या सुरुवातीच्या राजकीय काळामध्ये मेटे यांचे मला सहकार्य लाभले होते.
मराठा समाजाचे नेतृत्व करीत असताना विनायक मेटे यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी आपले आयुष्य व्यतीत केले. शिवसंग्रामच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. आमदार म्हणून त्यांनी सामान्य नागरिक आणि मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावले, असे श्री.सामंत म्हणाले.
शिवसंग्रामच्या माध्यमातून त्यांनी चळवळ उभा केली होती. मराठा समाजाबद्दल त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि उर्वरित प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे – फडणवीस सरकार पूर्ण करेल असा विश्वास मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 15/Aug/2022