दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमावरून देशभरात धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. त्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निझामुद्दीन मरकजवरून देशभरात निर्माण झालेल्या वातावरणाविषयी चिंता व्यक्त केली. हा कार्यक्रम महाराष्ट्रात होणार होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्परता दाखवून या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. दिल्लीतही केंद्र सरकारने तशीच तत्परता दाखवायला पाहिजे होती. जेणेकरून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नसती, असे पवार यांनी म्हटले. टेलिव्हिजन आणि अन्य माध्यमातून सातत्याने दिल्लीतील या घटनेविषयी गोष्टी दाखवून एका समुदायाविरोधात वातावरणनिर्मिती होत आहे. केंद्र सरकारने त्यावेळीच काळजी घेतली असती तर अशी वातावरणनिर्मिती करण्याची संधी मिळाली नसती.