जाकादेवी/संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित पाच दिवशीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रशिक्षणामध्ये एकूण ७० प्रशिक्षणार्थ्यांचा सामावेश असून या प्रशिक्षणात नागरी संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सहाय्यक उपनियंत्रक एम.के.म्हात्रे, सुनिल मदगे यांच्याद्वारे बौद्धिक व प्रात्यक्षिकांसह अतिशय सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे. शुक्रवारी २६ रोजी प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रमाला रत्नागिरीच्या मान. उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची खास उपस्थिती लाभणार आहे.
मोहिनी मुरारी शिक्षण संस्था व मालगुंड एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रशिक्षणामध्ये ७० प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश असून हे प्रशिक्षण गेले पाच दिवस अतिशय यशस्वीपणे सुरू असून या प्रशिक्षणामध्ये नागरी संस्था महाराष्ट्र राज्य विभागाचे सहाय्यक उपनियंत्रक हे मानवतावादी दृष्टिकोनातून सविस्तरपणे मार्गदर्शन करत आहेत.
आपत्ती काळामध्ये लोकांचा जीव वाचावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाची गरज ओळखून या प्रशिक्षणाची संकल्पना सर्वप्रथम शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी मांडली होती. सदरची संकल्पना मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव व युवा नेते रोहित मयेकर यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सत्यात उतरली. मयेकर महाविद्यालयात आयोजित केलेले आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रशिक्षण हे जिल्ह्यातील पहिले प्रशिक्षण होय.
या विशेष प्रशिक्षणामध्ये पुरामध्ये नागरिकांना कसे वाचवायचे, प्रथमोपचार कसा करावा, आग कशी विझवावी, तसेच दरडी कोसळल्याने होणारी आपत्ती, अपघातग्रस्त लोकांना प्रथमोपचार कसे करावेत, तसेच वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थिती कशा हाताळाव्यात, प्रसंगात मनोधैर्य कसे वाढवावे, याविषयी शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी अनेक बाबींवर अतिशय सविस्तर आणि प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात येत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू असून या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील एन.सी.सी. विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय व नागरी संरक्षण रत्नागिरी विभाग यांच्या मार्गदर्शनाने उपनियंत्रक एम.के.म्हात्रे, सुनिल मदगे यांच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरू आहे.
शुक्रवारी २६ रोजी या प्रशिक्षणाची सांगता होणार आहे. या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याचे मान. उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या आवर्जून उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून ज्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, अशा प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदरचे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, नागरी संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, प्रामुख्याने मयेकर शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, सचिव व युवा नेते रोहित मयेकर, संचालक मंडळ,महाविद्यालयाच्या प्राचार्या, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी मोलाचे सहकार्य करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 25/Aug/2022