रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. ज्यांचे रेशनकार्ड मध्ये नाव नाही व ज्यांना निकषांची अडचण येत आहे अशा गरजू नागरिकांना ही धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. सरकारने शिधापत्रिका धारक नागरिकांना धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. याच बरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांना ही सरकारने किमान 2 महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे, कारण शिमगा उत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आलेला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची संख्या वाढली आहे. या वाढलेल्या सदस्यांची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने त्यांना धान्य मिळणार नाही, यावर प्रशासनाने तोडगा काढून या संकटाच्या काळात नागरिकांना किमान 2 महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.
