मुंबई : देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवले जातात. अस्थी जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला पुन्हा गोळ्या मारल्या जातात हे तुमचं हिंदुत्व आहे का?
याकूब मेननच्या कबरीचं काय करायचं ते केले पाहिजे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचं काय? हा प्रश्न संघ, भाजपाला विचारायला पाहिजे असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
“प्रकरण अगदीच वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट…” असं म्हणत भाजपा नेत्याने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “माझ्या उद्धवला सांभाळून घ्या असे बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आलं आहे. प्रकरण अगदीच वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट…” असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली?”
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईट आहे. त्याचे समर्थन कुणी करू शकत नाही. याकूब मेननची फाशी आणि त्यावरील अंमलबजावणी भाजपा काळात झाल्या. जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
काय आहे वाद?
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. मुंबईच्या बडा कब्रिस्तान येथील हा प्रकार आहे. मेननच्या कबरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपात यांच्यात वादंग पेटला आहे. याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांची नावे समोर आली पाहिजे. हा देशद्रोहाचा प्रकार असून ज्यांनी कुणी सुशोभिकरणासाठी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 09/Sep/2022