रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा जयघोषात ढोल ताशांच्या गजरात शुक्रवारी वाजत-गाजत अनंत चतुर्दर्शी दिनी बाप्पांना निरोप देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात काल 33 हजार 550 घरगुती गणपती आणि 65 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले.
31 ऑगस्ट रोजी वाजत गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणपती आणि 114 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली. घरोघरी बाप्पाची भक्तीभावाने पुजाअर्चा करण्यात आली. मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. शनिवारी गौराईचे वाजत-गाजत आगमन झाले. रविवारी गौरीपुजन तसेच तिखटे सण साजरे झाले. दहा दिवस भक्तीभावाने पुजाअर्चा केल्यानंतर आज गणपतीबाप्पाला निरोप देण्यात आला.
रत्नागिरीत दुपारनंतर विसर्जनाला सुरूवात झाली. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत गणपतीबाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणेश विसर्जनासाठी गर्दी जमली होती. गणपतीबाप्पांचे मांडवी समुद्रकिनारी आल्यानंतर त्याठिकाणी बाप्पांची पुजा करण्यात येत होती. त्यानंतर आरती करून गणपती बा्प्पा मोरयाचा जयघोष केला जात होता. त्यानंतर वाजत-गाजत समुद्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते.
दरम्यान, मांडवी येथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. खासगी वाहनांना मांडवी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. गणेश विसर्जन पहाण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती. मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 10/Sep/2022