रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला, मॉस्कोमध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रशियातील मॉस्को येथील ‘मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर’ च्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे अनावरण पार पडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे – देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हंटलं की, रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे. जे वंचितांचे आवाज होते. ज्यांना आयुष्यात एकदाच शाळेत जाण्याचा अनुभव होता. 227 किमी चालून तो व्यक्ति पुण्यात आला. शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे लिहले. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ाचे मॉस्कोमध्ये अनावरण करण्याची संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. अण्णा भाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी आयुष्यभर कार्य केले. सामाजिक परिस्थितींमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण मोठी साहित्यनिर्मितीही केली. एकही दिवस शाळेत न गेलेल्या किंवा पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएच. डी करीत आहेत. मॉस्को राज्य ग्रंथालयाच्या या उपक्रमात मुंबई विद्यापीठाने सहभाग घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामान्य माणसाला जगण्याची ताकद व प्रेरणा मिळते.
महाराष्ट्रासाठी हा गौरवाचा क्षण
फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये तसेच गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये ज्यांच महत्वपूर्ण योगदान आहे. यांचा गौरव आज रशियाने केला याचा मला गर्व वाटतो आहे. त्याचबरोबर मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. अण्णा भाऊ साठेंनी अनेक संघर्षशील व्यक्तिमत्त्वे जगापुढे आणली. त्यांनी रशियाचा दौरा करून रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियातील क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्मृती आज याठिकाणी उभ्या राहत आहेत. हा त्यांच्या कार्याचा व मराठी जनांचा मोठा गौरव आहे, असे फडणवीस म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 15/Sep/2022