श्रीनगर – काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले असून, यामध्ये 1 पोलीस जखमी झाला आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून काही राजकीय नेत्यांसह 100 जणांना अटक करण्यात आली आहे.काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. श्रीनगरमध्ये काही दुकाने उघडलेली नजरेस पडत आहेत. तसेच बंदी असतानाही रस्त्यांवर किरकोळ वर्दळ दिसून येत आहे. तणाव असला तरी काश्मीरमधील एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दहफेकीचे काही किरकोळ प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करण्याच्या काही महिने आधीपासून त्या राज्यामध्ये सुरक्षास्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. काश्मीरमध्ये गेल्या दहा दिवसांत निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३५ हजार जवान तैनात करण्यात आले. त्यांना टेहळणी व संपर्कासाठी दोन हजार सॅटेलाईट फोन, ड्रोन व विमाने देण्यात आली.
