रत्नागिरी : शहरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. आता तर रस्त्यावर बसून हे फेरीवाले कटलरी पासून टेबल खुर्ची पर्यंत सर्वकाही विकताना दिसत आहेत. कोणताही कर न भरावा लागल्याने व इतर कोणताही खर्च नसल्याने हे फेरीवाले अत्यंत कमी किमतीत वस्तू विकताना दिसतात. याचा परिणाम आता रत्नागिरीतील व्यापारावर होऊ लागला आहे.
शहरातील बहुतांशी फेरीवाले हे परराज्यातील आहेत. सणासुदीच्या काळात स्थनिक पुढाऱ्यांना हाताशी धरत हे रस्त्यावर आपला धंदा थाटतात. त्यामुळे बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आज स्थानिक दुकानदाराला दुकानाचे भाडे, वीज बिल, घरपट्टी, जीएसटी आदी सर्व खर्च करावे लागतात. एखादे दुकान भाड्याने घेऊन फेरीवाल्यांनी त्याच किमतीत माल विकून दाखवावा असे आव्हान व्यापाऱ्यांनी दिले आहे.
नगरपालिका प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करते. अतिक्रमण हटवण्यासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च करणारी नगरपालिका याकडे दुर्लक्ष कसे काय करते असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास फेरीवाले व व्यापारी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांना देखील देण्यात आले असून प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 22/Sep/2022