रत्नागिरी : शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेले चाकरमानी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावातच अडकून पडले आहेत. या हजारो चाकरमान्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑनलाइन पोर्टेबिलिटीचा वापर करून मुंबईतील रेशन कार्डवरील धान्य गावातील रेशन दुकानांवर उपलब्ध करावे, असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी काढला आहे.
चिपळूणचेच आमदार शेखर निकम यांनी १० एप्रिल रोजी शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन चाकरमान्यांना गावातच रेशनचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या योग्य मागणीची दखल घेऊन शासनाने चाकरमान्यांची गैरसोय दूर केली आहे. गावाकडेच ऑनलाइन पोर्टेबिलिटीचा उपयोग करून हे धान्य वाटप केले जाणार आहे. नेटवर्क असणाऱ्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या चाकरमान्यांना याचा लाभ घेता येईल. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना नियमित व मोफत दिले जाणारे धान्य गावातील रेशन दुकानावर उपलब्ध होईल. चाकरमान्यांना धान्यपुरवठा करताना धान्याचा कोटा वाढवावा लागला, तर तसा अहवाल सादर करावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. आमदार शेखर निकम यांनी या साऱ्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल चाकरमान्यांनी निकम यांचे आभार मानले आहेत.
