राज्यात 20 हजार पोलिसांची पदं भरणार; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

0

मुंबई : पोलिस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायबर सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी 12 हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होईल. या भरतीसाठी लकरता लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

जेल विभागात सुधारणा करण्याची गरज
जेल विभागात सुधारणा करण्याची गरज असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “जेल विभगात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सध्या जेलधील 1641 कैद्यांची बेल झालेली आहे. परंतु, बेल बॉन्डसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते जेलमध्ये आहेत. अशा कैद्यांना कायदेशीर मदत करून त्यांना जेलमधून बाहेर कसं काढायचं यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर टीका केली. “संबंधित कंपनीला महाविकास आघाडीच्या सरकारने प्रकल्पासाठी जागा दाखवली नव्हती. शिवाय एकही कॅबिनेटची बैठक देखील घेण्यात आली नव्हती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना आवश्यक असणारी जागा दाखवली होती. हा प्रकल्प गुजरातला जातोय असे समजल्यानंतर आम्ही कॅबिनेटची बैठक घेतली आणि गुजरातपेक्षा जास्त सुविधा देत असल्याचे त्यांना सांगितले. कॅबिनेटीमधून मंजूर केलेलं पॅकेज देखील आम्ही त्यांना दाखवले. महाविकास आघाडीच्या काळात वेदांत प्रकल्पाबाबत काहीच झालं नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

नवरात्रीमध्ये दोन दिवस मध्यरात्री बारापर्यंत दांडिया खेळण्याची परवानगी
नवरात्रीमध्ये दोन दिवस मध्यरात्री बारापर्यंत दांडिया खेळण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी देखील मध्यरात्री 12 पर्यंत परवानगी देण्याचाही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत याबात चर्चा झाली आहे. लवकरच याबाबत देखील निर्णय घेऊ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 27/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here