रत्नागिरी शहरात भर वस्तीत बंगला फोडून सव्वातीन लाखांचा ऐवज चोरला

0

मारुती मंदिर येथील हि घटना सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरी : शहरातील भर वस्तीत मारुती मंदिर येथे एक बंगला फोडल्याची घटना काल उघडकीस आली आहे. हा बंगला फोडून चोरट्याने तब्बल सव्वातीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे आता खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज पाहून तपासाला लागली आहे. या बंगल्याचे मालक शशांक गांधी यांनी याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात दिली आहे.

तक्रारीत म्हटल्या प्रमाणे शशांक श्रीकृष्ण गांधी वय ६८ हे मारुती मंदिर येथे श्रीकृष्ण स्मृती या आपल्या बंगल्यात राहतात. २० सप्टेंबर रोजी ते आपल्या कामासाठी पत्नीसोबत कोल्हापूर येथे गेले होते. कोल्हापूर येथील काम आटोपल्यावर ते २६ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या घरी आले असता त्यांना हि घटना निदर्शनास आली. घरामधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते तर बेडरूम मधील कपाटे उघडी असल्याचे त्यांनी पहिले. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना खबर दिली. याच घरामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झालेला पहावयास मिळत आहे. या सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तब्बल दोन तास चोरटा घरामध्ये चोरी करीत होता. घराच्या खिडकीचे ग्रील तोडून त्याने आत प्रवेश केला होता.

चोरट्याने डायमंड कुडी, सोन्याचे झुमके, दीड तोळ्याच्या दोन बांगड्या, सोन्याचा हार, चांदीचे ताट, तीन चांदीच्या मुर्त्या व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहरात मागील काही दिवसात झालेल्या चोरीतील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र आता हि नवी घटना समोर आल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:16 PM 27/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here