मुंबई : राज्यातील राजकारणात २०१९ मध्ये ऐतिहासिक उलथापालथ पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरून भाजपाशी वितुष्ट आल्यानंतर शिवसेनेने थेट विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडी तयार केली.
मविआनं २०१९ मध्ये राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. परंतु ही आघाडी २०१४-२०१९ या काळातच होणार होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही असंही चव्हाणांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 29/Sep/2022