नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला टी-२० वर्ल्डकपच्या आधी मोठा झटका बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
पुढील महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे आशिया कपमध्ये बुमराह खेळला नव्हता. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने कमबॅक केले होते.
बुमराहने २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची टी-२० मॅच खेळली होती. त्या सामन्यात बुमराहने ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या. टी-२० मधील ही त्याची सर्वात वाईट कामगिरी होती.
बुमराहला चार आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या सोबत आहे. निवड समिती त्याच्या जागी अन्य खेळाडूची टी-२० वर्ल्डकप संघात निवड करण्याची शक्यता आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी ऑलराउंडर रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 29/Sep/2022