रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या भाट्ये खाडीतील गाळाच्या समस्येबाबत मच्छीमार आक्रमक झाले आहेत.
खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांना सतावत आहे. त्यासाठी जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने निमंत्रित केलेल्या सभेला चारही गावांतील सुमारे २०० मच्छीमार उपस्थित होते. यावेळी गाळ उपसणे आणि बंधारा बांधण्याबाबत जोरदार चर्चा झाली. यावेळी उपस्थित मच्छीमारांनी काही सूचनाही केल्या.
चार गावांतील मच्छीमार सध्या भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळाच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. खोल समुद्रातून मासेमारी करून परतत असताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी जात असताना त्यांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. तसेच अनेकदा या गाळामध्ये मासेमारी नौका अडकून झालेल्या अपघातात मच्छीमार दगावल्याच्या आणि नौका बुडाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, ही मच्छीमारांची प्रमुख मागणी आहे.