रत्नागिरी : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर सूचना आणि मार्गदर्शक फलक लावण्याची सूचना इतिहास अभ्यासक महेश कदम यांनी प्रशासनाला केली आहे.
रत्नागिरी शहराच्या वैभवशाली ऐतिहासिक कारकिर्दीत भर टाकून त्याचे महत्त्व दाखवणारा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. याच किल्ल्यावर भगवतीदेवीचे मंदिर आहे. मात्र, येथे सूचना व मार्गदर्शक फलक नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. रत्नदुर्ग किल्ल्याचा दर्शनी भागही दुर्लक्षित राहिला आहे याची दखल घेणे आवश्यक आहे.
कदम म्हणाले, आतापर्यंत विविध ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. तेथील ऐतिहासिक संदर्भही शोधून काढले आहेत. रत्नदुर्ग किल्ल्याचा विस्तार सुमारे १२० एकर क्षेत्रफळात असून बालेकिल्ल्यासह तीन किलोमीटर तटबंदी आणि ३५ बुरूज आहेत. यांसह इतरही अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. सध्या हाच मुख्य भाग मार्गदर्शक फलकाअभावी माहितीविना राहिला आहे. मिरकरवाडा बाजूकडील माचीवर बुरूज, तटबंदी, जंग्या, मंदिर परिसरात प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांचा खच वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी किल्ले संवर्धन करणा-या तरुणांनी रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम राबवून काही पोती प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या जमा केल्या होत्या. तरी अजूनही हे अवैध प्रकार येथे चालतच आहेत. यासाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर प्लास्टिक बंदी व्हावी, पर्यटकांना किल्ल्यावरील विविध ठिकाणे पाहण्याकरिता मार्गदर्शक फलक, इतिहास आणि किल्ला नकाशाही उभारण्यात आला पाहिजे, असे कदम यांनी सुचविले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 14/Oct/2022