चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला : राज ठाकरे

0

मुंबई : अभिनेता सुबोध भावे लवकरच शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटात दिसणार आहे. सुबोध शिवरायांच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने सुबोधने राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

यावेळी राज ठाकरेंनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात पहिल्यांदा कधी आले, त्यावरही भाष्य केले. मुलाखतीच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी त्यांच्या नावावर प्रतिक्रिया दिली. सुबोध भावे म्हणाले की, तुमचे खरे नाव स्वरराज, मग राज ठाकरे कस झाले? यावर राज ठाकरे म्हणाले, ‘माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, असे त्यांना वाटायचे. पण, मी व्यंग काढायला लागलो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी बाळा ठाकरे नाव लावतो, तू राज ठाकरे लाव. तेव्हा माझे दुसऱ्यांदा बारसे झाले.

राज ठाकरेंनी 17 दिवस डबिंग केले
हर हर महादेव चित्रपटाला आवाज का दिला? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, ‘मी पहिल्यांदा 2003मध्ये व्हॉइस ओव्हर केला होता. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घेतली होती. 2004ला शिवसेनेचे कँपेन केले होते, तेव्हा 9 अॅड फिल्म्स केल्या होत्या, त्यांना अजित भुरेंनी आवाज दिला. त्यातील एका फिल्ममध्ये सुरुवातीचा आवाज दिला होता. या चित्रपटाला आवाज देण्याचे कारण म्हणजे, चित्रपट शिवरायांचा आहे. याच कारणामुळे आवाज दिला.’

शिवराय आयुष्यात कधी आले?
राज ठाकरे म्हणाले, ‘1974 मध्ये मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शिवराय आले. बाबासाहेब पुरंदरेंनी मुंबईत शिवसृष्टी उभारली होती. ती शिवसृष्टी बनत असताना, बाळासाहेबांचे त्यात मोठे योगदान होते. बाळासाहेब रोज तिथे जायचे आणि मीही त्यांच्यासोबत असायचो. ती बनली आणि संपेपर्यंत 15-20 दिवस मी रोज तिथेच जायचो. मी रोज राज्याभिषेक सोहळा पाहिला आणि शिवराय माझ्या आयुष्यात आले,’ अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here