देवरुख : कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण अर्थचक्र बंद असताना देवरुख स्टेट बँकेचे शाखाधिकारी अमोल शेंडगे यांनी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केलेली उपाययोजना आदर्शवत असून इतर बँकांनी देखील यातून बोध घ्यावा असे नागरिकांचे म्हणणे आहे. या अडचणीच्या काळी गोरगरीब जनतेला मदत म्हणून सरकारने जन धन खात्यातून काही रक्कम जमा केली. हि रक्कम जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी देवरुख स्टेट बँकेच्या शाखेने प्रचंड मेहनत घेतली. खातेदारणाची गावनिहाय वर्गवारी करून त्यांच्यासाठी गावातून बँक काऊंटर उघडण्यात आले. १६ एप्रिल रोजी वाशी तर्फे देवरुख, ता. संगमेश्वर या गावातील सुमारे १०० हून अधिक जन धन खातेदारांना रकमेचे वाटप करण्यात आले. बँकेने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत होणारी गर्दी कमी झाली. लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच वेळेवर मदत मिळाली. या बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅिनटायझरने हात स्वच्छ केल्यावरच प्रवेश दिला जातो शिवाय सोशल डिस्टंन्स ठेवण्यासाठी बँकेच्या बाहेर मंडप घालून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाखाधिकारी अमोल शेंडगे यांनी केलेल्या या व्यवस्थेमुळे नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत. इतर बँकांनी देखील यातून बोध घ्यावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
02:17 PM 28/Apr/2020
