रायगड : राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच महाराष्ट्र शासनाने राजस्थान सरकारसोबत संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आले आणि यातील 32 विद्यार्थी आता रायगडकडे रवाना झाले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसीलदार विशाल दौंडकर यांनी पुढील समन्वयाची आवश्यक ती तयारी केली. 28 एप्रिलला या विद्यार्थ्यांना घेऊन राजस्थानवरून बसेस निघाल्या असून प्रवासात त्यांच्याकरिता उज्जैन व धुळे येथे फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधी सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पनवेल येथे आणल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 28 दिवसांपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
