संचारबंदी काळात जिल्हाभरात तब्बल 773 वाहनांवर जप्तीची कारवाई

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केलेले असतानाही नियम डावलून रस्त्यावर फिरणारी 773 वाहने जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात जप्त करण्यात आली आहेत. तर गुहागर पोलिसांनी सर्वाधिक 173 वाहने जप्त केली. जिल्हा वाहतूक शाखेने 159 वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच गाड्या मालकांना परत केल्या जाणार आहेत.संचारबंदीच्या कालावधी नागरिक विनाकारण वाहने घेऊन रस्तावर फिरतात. घरानजीक अत्यावश्यक साहित्यांची दुकाने सुरू असताना विविध कारणे देऊन नागरिक बाहेर फिरताना पोलिसांना आढळले आहेत. सुरुवातीला दंड भरून वाहनचालकांना सोडण्यात येत होते. तरीही रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. दि. 22 मार्च पासून तब्बल 773 वाहने जप्त करण्यात आली त्यामध्ये दापोली 17, खेड 92, गुहागर 173, चिपळूण 98, राजापूर 56, मंडणगड 3, लांजा 57 , देवरुख 70, रत्नागिरी ग्रामीण 7 , रत्नागिरी शहर 5, संगमेश्वर 4,आलोरे 14, सावर्डे 18 तर जिल्हा वाहतूक शाखाने 150 दुचाकीसह 9 चार चाकी वाहने असे एकूण 159 गाड्या जप्त केल्या आहेत.सागरी पोलिसां ठाण्यापैकी जयगड ,नाटे ,पूर्णगड, दाभोळ या पोलीस स्थानकांच्या अंतर्गत नागरिक अनावश्यक बाहेर फिरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे एक ही गाडी पोलिसांनी जप्त केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here