रत्नागिरी : तालुक्यातील कुर्धे येथे दोन दुचाकीच्या अपघातात तिघे जखमी झाले असून एका दुचाकी चालकाविरुद्ध पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना शनिवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साईप्रसाद दिपक चव्हाण (26, रा.पूर्णगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात राज संजय तोडणकर (25, रा. कुर्ली पोस्ट भाट्ये, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानूसार, शनिवारी सायंकाळी संजय तोडणकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08- एझेड- 8934) वरुन त्याची मैत्रिण हर्षदा शैलेंद्र चव्हाण (22, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) हिला सोबत घेउन कशेळी ते कुर्ली असा जात होता. त्याच सुमारास साईप्रसाद चव्हाण आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08- एटी- 6119) वरुन भरधाव वेगाने समोरुन येत होता. ही दोन्ही वाहने कुर्धे येथील नामदेव स्टॉपजवळ आली असता साईप्रसादचा आपल्या दुचाकीवरील ताबा सूटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला येत संजय तोडणकर यांच्या दुचाकीला समोरुन धडक देत अपघात केला. यात दोन्ही दुचाकींवरील तीघांनाही दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार महेश कुबडे करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 09/Nov/2022